Showing posts with label Others. Show all posts
Showing posts with label Others. Show all posts

Friday, 18 December 2015

चमचे

एटीकेट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत! - पु. ल. देशपांडे

सगळ्यांत उत्तम 'एटीकेट म्हणजे' सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत. सूप, बासुंदी, रस याच्या वाट्या तोंडाला लावाव्यात आणि घोटाघोटाने संपवाव्यात.

ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडापासून वाटी अलग करू नये.

आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरमगरम कालवावा.

ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभात आणि दहीभात यांचीही एकच कृती.

जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा राहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास, केरळ इथे बदली होऊ शकते.

रसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करून खाणाऱ्या मंडळींचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल ही भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.

जिलबी मात्र मठ्ठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.

श्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधासारखे जिभेला लावायचे असते.

पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुलासारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड, बासुंदी, आमरस ही मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.

मिठाच्या डावीकडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किंवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.

कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्‍याचा आणि सुरांचा जीव घेत त्याचा प्रवास सुरू असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि मैफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात. पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.

पापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारे आहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.

हल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात. बटाटावड्याच एवढं बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटावडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का ? भजी मात्र चालतात.

स्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे.

साधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्याबद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले की हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील ही शंका मनात पिंगा घालायला लागते.

चिवड्याला चमचा नको पण या यज्ञकर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे.

ही पाच बोटे ही पंचमहाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्त्व. जेवताना ही पंचमहाभूतं जेवणात उतरायला हवीत.

राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली.

पु. ल. देशपांडे

खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे.


पु.लं.चं 😊......
                     
खाण्याचंसुद्धा शास्त्र आहे. 
रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. 
उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा! 
तर श्रीखंड पावाला लावून खा, म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे! 
जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही.

खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. 

रागांप्रमाणेच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं. सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. 

बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी तीन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. 

अधिकचं हे असं आहे. 
लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. 
हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. 
शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. 
मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. 
आणि चहाबरोबर भलतंच खातात.. 
आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे.

खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. 

ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. 
उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. 

लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. 

माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई.

सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे; नव्हे, टिकली आहे. 

होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षीणच व्हायचा. 
दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. 
संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. 
कोजागिरी पौर्णिमेतनं आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जागरण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. 
गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या? 
रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... 
सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. 
हेच गाळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी आहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. 
पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.

(पु. ल. देशपांडे) 

शुभ खाद्यान्न ! 

Monday, 18 May 2015

'अरुणा'स्त

 

42 वर्ष एक वेदना घेऊन ती जगत होती... जगत होती, किंवा कदाचित आला दिवस पुढे ढकलत होती. तिच्या संवेदना कोणीच शब्दात मांडू शकणार नाही. ती 'जगली' 24 वर्ष आणि 'मृत्युपंथावर' होती 42 वर्ष! अरुणाच्या जीवन-मृत्यूचा हा अजब खेळ 18 मे रोजी अरुणोदय झाला तेव्हा संपला.

गेली 42 वर्षांत आजूबाजूच्या जगात कितीतरी गोष्टी बदलत आहेत, पण तिच्या वर्षानुवर्षांच्या दिनक्रमात जरासाही फरक पडला नाही. नाही म्हणायला तिच्या तरुण शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागल्या. तिचे केस पांढरे झाले, सुरकुत्या आल्या. तिचा श्वास आणि ह्रदय सुरु होतं, मात्र तिच्यासाठी काळ 27 नोव्हेंबर 1973 च्या त्या रात्रीच थांबला.

कोण होती अरुणा?

कारवारमधल्या हल्दीपूर या छोट्याशा गावातून आलेली अरुणा मुंबईत येऊन जनसेवेसाठी नर्स झाली. केईएममध्ये नोकरी करत असताना तिथल्याच एका डॉक्टरशी तिचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यांचं लग्नही ठरलं. पण तिथेच नोकरी करणार्‍या सोहनलाल वाल्मिकीनेही तिला लग्नासाठी विचारलं. तिने नकार दिल्याने त्याला राग आला.

काय झालं त्या रात्री ?

अरुणाने नकार दिल्याच्या खुनशीतूनच सोहनलालने तिच्या गळ्यात कुत्र्याची साखळी बांधून तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिच्या मानेतल्या नसा बंद झाल्या त्या कायमच्याच. तेव्हापासून तिची शक्ती, वाचा, दृष्टी, संवेदना सारं काही गेलं.

सोहनलालला पुण्यात अटक झाली, शिक्षाही झाली ती चोरी आणि खुनाच्या प्रयत्नासाठी. प्रत्येकी सात वर्षं आणि तीही एकत्र भोगायची. तो बाहेर आला आणि बदला घ्यायचा म्हणून केईएममध्ये दाखल असलेल्या तिच्या बेडची रेलिंगच काढून टाकली. खाली पडल्याने तिला जखमा झाल्या.

तिचा एकेकाळचा प्रियकर आणि भावी नवरा असलेल्या डॉक्टरने दुसरं लग्न केल होतं. तिच्या नातेवाईकांनीही तिला सोडलं होतं. तिच्यावर बलात्कार करुन तिला या अवस्थेत आणून सोडणार्‍या सोहनलालने आपली शिक्षा पूर्ण केली होती. दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये तो उजळ माथ्याने नोकरीही करत होता.

सामाजिक कार्यकर्त्या पिंकी विराणी यांनी अरुणावर पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव 'अरुणाज स्टोरी'. हेच पुस्तक मराठीत अक्षर प्रकाशनाने 'अरुणाची गोष्ट' या नावाने आणलं. विनय आपटे यांनी 'कथा अरुणाची' हे नाटक रंगमंचावर आणलं.

ज्या केईएम रुग्णालयात माणुसकीशून्य सोहनलाल होता, त्याच ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या नर्स आणि डॉक्टर्सही होते. केईएमच्या मॅनेजमेंट, डॉक्टरांनी आणि सर्वांनीच तिला आपलं मानलं आहे. तिच्यावर एवढी वर्षं उपचार सुरु आहेत. पण त्यात उपकारांच्या भावनेचा लवलेशही नाही.

तिला दयामरण देण्याची मागणी झाली तेव्हा देशात वादळ उठलं. सुप्रीम कोर्टाने तिच्या दयामरणाचा प्रश्न निकाली काढला आणि केईएममधल्या नर्सनी जल्लोष साजरा केला.

अरुणाबरोबर काम करणार्‍या नर्सेस केव्हाच रिटायर झाल्या आहेत. पण नंतरच्या पिढीनेही तिचा प्रेमाने सांभाळ केला आहे. ती खोली गेली 42 वर्षं राखीव आहे.

अरुणा यांच्या मृत्यूने एका पर्वाचा अंत झाला. अरुणामुळे देशाला दयामरणाचा कायदा मिळाला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या रुपाने अरुणा तिचा सेवाभाव पुरवतच राहिली. ती गेली आणि सकाळीच 'अरुणा'स्त झाला.